पुणे : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोसमी पाऊस अखेर रविवारी कोकणात दाखल झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वारे दाखल झाले असून पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात पहाटे आणि सकाळी हलक्या सरींचा शिडकावा झाला. किनारपट्टीवर ढगांची दाटी असून, वाऱ्यांचा वेगही वाढला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या सीमेपर्यंत मोसमी वाऱ्यांनी आगेकूच केली आहे. कर्नाटकातील शिवमोगा, हसनपर्यंत आणि केरळमधील श्रीहरीकोटा, तमिळनाडूतील धर्मपुरी, आसाममधील धुब्रीपर्यंत मोसमी वाऱ्यांनी मुसंडी मारली आहे. राज्यात सामान्यपणे मोसमी पाऊस ७ जूनला दाखल होतो. यंदा तो पाच दिवस उशिराने दाखल झाला आहे. केरळमध्येच तो उशिराने म्हणजे ७ जून रोजी दाखल झाला होता. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याचे हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार रविवारी मोसमी वाऱ्यांनी अवघ्या चारच दिवसांत रत्नागिरीत हजेरी लावली आहे.
राज्यात अन्यत्र पूर्वमोसमीचा इशारा
राज्यात तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवस सोसाटय़ाचा वारा वाहून, विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या सरींची शक्यता आहे.
चक्रीवादळाचा कच्छला तडाखा बसण्याची शक्यता
पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे चक्रीवादळ गुजरातमधील कच्छ आणि पाकिस्तानमधील कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातील चक्रीवादळ यापूर्वी ओमानच्या दिशेने जाण्याची शक्यता होती. पण, आता चक्रीवादळाने दिशा बदलली आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालेले बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. गुरुवारी, पंधरा जून रोजी दुपारी चक्रीवादळ कच्छ आणि कराची दरम्यानच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. सध्या चक्रीवादळ कच्छच्या वायव्येस अरबी समुद्रात ६१० किलोमीटर आहे.
गुजरातच्या किनारपट्टीवर सोमवारी सुमारे पन्नास किलोमीटर प्रती तास, मंगळवार आणि बुधवारी सुमारे सत्तर किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहू शकते. गुरुवारी वाऱ्याचा वेग ७५ किलोमीटर प्रती तासांवर जाऊ शकतो. पुढील चार दिवस मच्छीमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये.
अंदाज काय? मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पुढील ४८ तास पोषक वातावरण आहे. दोन दिवसांत संपूर्ण तळकोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, बिहार आणि ईशान्येकडील राज्यांत मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहील, असा अंदाज आहे.
Discussion about this post