नाशिक : नाशिक येथून बंगळुरु येथे भाजीपाला पोहोचवण्यासाठी जात असताना पिकअप वाहनावरील ताबा सुटल्याने कर्नाटकातील चितचोर येथे अपघात झाला. यामध्ये पिकअप चालक गोरख रमेश पाटोळे (वय ३६ वर्ष, रा. लोहशिंगवे, ता. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गोरखचे आई वडील पंढरपूरच्या दिंडीत वाटेवर असतानाच गोरखचा अपघाती मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त समोर आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच त्याच्या गावातील नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी घाव घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोरख रमेश पाटोळे यांनी अडीच महिन्यांपूर्वी नवीन पिकअप घेतली होती. गावातील या दोन्ही पिकअप गाड्या एका भाजीपाला व्यापाऱ्याकडे लावल्या होत्या. मंगळवारी २० जून रोजी या दोन्ही गाड्यांमध्ये गाजर व भाजीपाला भरून पळसे येथून निघाल्या होत्या. बंगळुरुला भरधाव वेगाने भाजीपाला नेत असताना वाहनावरील ताबा सुटल्यानंतर चितचोर (कर्नाटक) भागात रात्रीच्या सुमारास पिकअपची रस्त्याच्या डिव्हायडरला जोरदार धडक बसली. गाडीचा भीषण अपघात झाला व त्यात गोरख पाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला.
पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या पिकअप गाडीतील वाहन चालकाने या अपघाताची माहिती लोहशिंगवे गावातील मित्रांना व नातेवाईकांना कळविल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शवविच्छेदन झाल्यानंतर गोरखचा मृतदेह लोहशिंगवे येथे आणण्यात आला. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात पिकअपचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान ,मृत गोरखचे आईवडील यंदा गावातून निघालेल्या दिंडीत सहभागी झाले होते. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात पंढरपूरच्या वाटेवर होते. गोरख यांच्या अपघाताची घटना घडल्याने त्यांना घेण्यासाठी नातेवाईक पालखी असलेल्या दिशेने जाऊन घेऊन आले. गोरख पाटोळे यांच्या पाश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ असा परिवार आहे.
Discussion about this post