UPSC सिव्हिल सेवा परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या अनेक तरुण आणि तरुणींच्या संघर्षाच्या कथा या कायमत प्रेरणा देणाऱ्या असतात. आजवर अनेक IAS ऑफिर्संनी मोठा संघर्ष करून जिद्दीने आणि कष्टाने आयुष्यामध्ये यश मिळवलं आहे.
अशीच एक तरुण IAS ऑफिसर म्हणजे हरियाणातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अंकिता चौधरी. हरियाणामधील रोहतक इथल्या एका लहानश्या गावातील अंकिताने जिद्दीच्या जोरावर UPSC ची परीक्षा देऊन संपूर्ण भारतातून १४ वी रँक मिळवली आहे.
IAS बनण्यापर्यंतचा अंकिताचा प्रवासही सोपा नव्हता. या प्रवासात तिला काही मोठे धक्के पचवावे लागले. मात्र तिने जिद्द सोडली नाही. २०१७ मध्ये ज्यावेळी अंकिताने पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली तेव्हा ती अपयशी ठरली.
त्यानंतर मात्र तिने जिद्द सोडली नाही आपल्या चुका सुधारल्या. कमतरता जाणून घेतल्या आणि पुन्हा मेहनतीने अभ्यास सुरू केला. दुसऱ्या परिक्षेतच अंकिताने ऑल इंडिया १४वा क्रमांक मिळवला.
अंकिताचे वडील एका साखर कारखान्यात काम करायचे. अंकिता लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होती. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी तिने दिल्लीतील हिंदू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन करत असतानाच अंकिताने स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार केला.
मात्र आधी शिक्षण पूर्ण करण्याचं तिने ठरवलं. अंकिताने ग्रज्युएशन पूर्ण करून आयआयटी दिल्लीमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेतला. यावेळी तिला स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता.
आईच्या मृत्यूने मोठा धक्का
मास्टर्स पूर्ण झाल्यानंतर पूर्ण वेळ UPSCची तयारी करण्याचं तिने ठरवलं. दरम्यान अंकिताच्या आईचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला. यामुळे अंकिता पूर्णपणे खचली. तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र यावेळी अंकिताला तिच्या वडिलांनी सावरलं आणि धीर दिला. यामध्ये अंकिताने २०१७ साली UPSCची पहिली परीक्षा दिली आणि तिला अपयश आलं.
योग्य रणनीती आखली
UPSCमध्ये अपयश आल्यानंतर मात्र अंकिता खचली नाही. पुन्हा पूर्ण तयारी करूनच परीक्षा द्यायची तिने ठरवलं. यासाठी तिने आपल्याकडून काय चुका झाल्या आहेत यावर विचार करून त्या सुधारायच्या ठरवल्या. योग्य रणनीती आखली आणि पुन्हा मेहनतीने अभ्यास सुरू केला.
२०१८मध्ये अंकिताने दुसऱ्यांदा UPSCची परीक्षा दिली आणि मोठं यश गाठलं. भारतामध्ये १४ वा क्रमांक पटकावल्याने तिचं सर्वत्र कौतुक झालं.
तरुणांना सल्ला
तरुणांनी सर्वप्रथम महाविद्यालयीन शिक्षणावर भर देऊन ते पूर्ण करावं असा सल्ला अंकिता चौधरीने तरुणांना दिला आहे. पदवीचं शिक्षण पूर्ण होताच तरुणांनी योग्य रणनीती आखून पुस्तक आणि इतर साहित्यांच्या मदतीने तयारी सुरू करावी. जोवर तुम्ही पूर्ण तयार नाहीत तोवर परीक्षा देऊ नका असं ती म्हणते.
Discussion about this post