जालना: दारू प्यायला ५० रुपये न दिल्याने एकाच्या छातीवर चाकूने वार करून त्या व्यक्तीला गंभीर जखमी केल्याची घटना जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील केळीगव्हान येथे दिनांक 15 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.या घटनेनंतर दारू पिण्यासाठी पैसे मागणारा आरोपी भागवत शिवाजी मदन हा फरार झाला होता.परंतु, पोलिसांनी त्वरित पावले उचलत पाठलाग करून भागवत मदनला ताब्यात घेतले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील रहिवासी पप्पू भाऊसाहेब मदन हे आपल्या घरासमोर उभे होते. यादरम्यान, गावातील भागवत शिवाजी मदन त्या ठिकाणी आला. त्याने पप्पू मदन यांना काय चाललेय असं विचारत मला दारू पिण्यासाठी पन्नास रुपये दे अशी मागणी केली. पप्पू याने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ केली पण भागवत याने पप्पू कडे पैशांसाठी तगादा लावत हुज्जत घालण्यास सुरवात केली.
दारूची तलफ लागल्याने बेचैन झालेल्या भगवतला पप्पू यांनी पैसे देण्यास नकार देताच भागवतने शिवीगाळ सुरू केली. पप्पू मदन यांचा गळा धरून त्यांना खाली ओढले. काही समजायच्या आत खिशात हात घालून चाकू काढून पप्पूच्या छातीवर आणि हातावर चाकूने वार करत त्याला गंभीर जखमी केले. पप्पू मदन यांनी जोरजोरात आरडाओरडा करताच गावातील लोकं जमा झाले. गावकऱ्यांनी पप्पू यास जखमी अवस्थेत जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या घटनेनंतर आरोपी भगवान मदन हा तेथून फरार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत जखमी पप्पू मदन यांच्या तक्रारीवरून भागवत शिवाजी मदन याच्या विरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयन्त केल्याप्रकरणी भादवि ३०७,५०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी बटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार अधिक तपास करत आहेत.दरम्यान फरार झालेल्या भगवतच्या मागावर असलेल्या पोलिसांनी भागवतला शोधले असून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Discussion about this post